Monday, August 30, 2010

गोकुळअष्टमी, गोपाळकाला

श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. दिवसभर उपास देखील करतात, संपूर्ण रात्र भजन, किर्तन यामध्ये घालवतात. दुसरा‌ दिवस असतो तो गोपाळकाल्याचा. दही, दूध, लोणी, पोहे व लाह्या एकत्र करुन मटक्यात भरतात, त्याची दहिहंडी तयार केली जाते, ती लहान बाळगोपाळांकडून फोडली जाते. अश्याप्रकारे हे दिवस अतिशय उल्हासात पार पाडतात.

आता मात्र या उत्सवाला स्पर्धा आणि एक करमणूक  असे स्वरुप मिळाले आहे, त्यामागचा धार्मिक भाव कुठेच दिसत नाही. पण त्यामगचा उद्देश मात्र आजही जपला जातो, रोजच्या कामातुन, धकाधकीतुन वेळ काढुन लोक एकत्र येतात. एकमेकांच्या विचांरांची देवाणघेवाण केली जाते आणि परत एकदा दाखवून दिले जाते, "एकी हेच बळ".

तरी गोकुळअष्टमी, गोपाळकाला, दहिहंडी या विषयांवर या व्यतिरिक्त अजून काही माहिती असल्यास पाठवावी.

श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा

सुरुवात केली ती जिवतीचा फोटो शोधायला. इंटरनेटवर खूप शोधून पण स्कॅन कॉपी मिळाली नाही. शेवटी फोटो कुरियरने मागवून घेतला आणि स्कॅन करून हया ब्लॉगवर टाकला आहे.

फोटोबद्दल थोडक्यात:
नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची, चार शनिवार नरसोबाची, चार बुधवार बुधाची, चार गुरुवार बृहस्पतीची पूजा करतात.
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात. पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. घरातील लहान मुलांना औक्षण करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.
ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.

Wednesday, August 18, 2010

श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या

हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी दिवसभर उपास करुन सायंकाळी आंघोळ करुन ही पूजा करतात. यामध्ये विशेषत: चौसष्ट योगिनींची पूजा करतात. चौरंगावर सात शक्ती देवतांची स्थापना करतात त्या अश्या, ब्राह्मी, महेश्र्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा. पुढे कलशावर तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट सुपार्‍या चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. अशा कला ज्यांमुळे उपजिवीका होते म्हणजेच योगिनी. पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, परंतु अता मात्र यांच्या चित्राचा कागद मिळतो, त्याची पूजा करतात.
                    चौसष्ट योगिनी - पूजेचे चित्र                               चौसष्ट कला
या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात. वरीलप्रमाणे पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात.
पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.
स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे. 
                   ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी. तर मग या दिवशी 'मातृदिन' का साजरा करत नाहीत? 
तुमच्या प्रतिक्रियांची आणि याविषयाबद्दल असलेल्या अजून काही माहितीची मी वाट पहातीय...              

Tuesday, August 17, 2010

श्रावणी सोमवार - शिवामुठ, फसकी

लग्ना नंतर पहिली पाच वर्ष शिवामुठ वाहतात. श्रावण महिन्यातील दर सोमवारी एक धान्य शंकराच्या पिंडीवर वाहतात. पहिल्या सोमवारी तांदूळ, नंतर तीळ, मूग, जव आणि पाचवा आला तर सातू घेतात.
शंकराच्या पिंडीवर बेल,हातातील धान्य वाहून पुढील प्रार्थना करतात,
"शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामुठ, ईश्वरादेवा, सासूसासरां, दिराभावा, नणंदजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा !"  
 दिवसभर उपास करतात व रात्री तो मुक्याने जेवुन सोडतात.
या व्रताप्रमाणे काही ठिकाणी फसकीचे व्रत देखील करतात. ते असे, पसाभर तांदूळ घेऊन महादेवाची पूजा करतात, "जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी" असं म्हणून हातातील तांदूळ पिंडीवर वाहतात व राहीलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहतात. दर सोमवारी हीपण पूजा केली जाते. पाच वर्षांनी मात्र या पूजेचे उद्यापन करतात.
हल्ली प्रत्येक घरांमध्ये येणारी सून ही लाडकी आणि आवडती असतेच. आर्थिक परिस्थिती देखील चांगली असते, तरी पूर्वी पाळत असलेल्या प्रथा आजही काही घरांमध्ये नविन सूनांकडून करवुन घेतल्या जातात, असं का?
असो, या दोन्ही पूजेबद्दल अधिक माहिती असल्यास ती कळवावी.        

Monday, August 16, 2010

श्रावण - नारळीपौर्णिमा / राखी पौर्णिमा / श्रावणी पौर्णिमा

`पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.' म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते. ही पद्धत विशेषकरुन उत्तर हिंदुस्थानात आहे. बहिण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

समुद्रकिनारा असलेल्या भागांमध्ये विशेषत: कोळी समाजात या दिवशी समुद्राची पूजा करतात व त्यात नारळ सोडतात. नुकताच पावसाळा संपलेला असतो, झालेली मासेमारी जशी चांगली झाली तशीच ती पुढे चालु राहू देत. अशी प्रार्थना करतात व नारळ सोडून कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणून या दिवसाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात.
यादिवशी पक्वान्न म्हणून नारळाचे विविध गोड पदार्थ करतात.

पोळा/ बैलपोळा

श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा केला जातो. या सणाला शेतकरी लोकांमध्ये खूप महत्व आहे. शेतकरी या दिवशी बैलांना तेल लावुन आंघोळ घालतात, त्यांना सजवुन औक्षण केले जाते, दुपारी पुरणपोळीचे जेवण करुन ते बैलांना खाऊ घालतात.तसेच त्यांची वाजतगाजात मिरवणुक काढली जाते.  शेतीमध्ये बैलांची होणारी मदत अमुल्य आहे, आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो.
काही ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. पण मला कळालेल्या माहिती मध्ये एक गोष्ट इथे नक्की सांगावी वाटते, या शर्यतींच्या वेळी बैलांना दारु पाजली जाते, जेणेकरुन ते आवेषाने पळतील. परंतु ज्याची आपण पूजा करतो त्याच्या जिवाशी केवळ बक्षिसाच्या रकमेसाठी का खेळायचं? कधी ते प्राणांवर देखील बेतु शकतं? मग दोष कोणालाही देता येणार नाही.
या बद्दल तुमच्या  प्रतिक्रिया जाणायला मला नक्की आवडेल.तर मी वाट बघतीय.....

Sunday, August 15, 2010

श्रावण - मंगळागौरी

माझी पहिलीच वेळ. मोठ्या बहिणीची झाली तेव्हा पाहीली होती. मग परत एकदा प्रश्न पडायला सुरुवात झाली.....
          मला आई-बाबा,ताई फोन वरुन माहिती, पूजेचा विधी सांगत होते. त्याप्रमाणे तयारी चालू केली. अहोंना सोबत घेऊन पूजेच सामान आणून ती उत्तम रितीने पार पाडली, ती अशी.....
चौरंगावर गौर बसवली, तिला तांदूळ-मुगाची डाळ  वाहिली, समोर वाळूची महादेवाची पिंड स्थापन केली, त्यावर वेगवेगळी पत्री वाहिली, भोवताली फुलं-पानं,रांगोळी यांची आरास केली.सोळा वाती लावुन  पुरणाची आरती केली, नंतर कहाणी वाचली. मुक्याने जेवण केले.
पण अजूनही काही प्रश्न आहेत....आणि उत्तर हवी आहेत ती तुम्हा जाणकारां कडून.....
१. ही पुजा कोणी करायची?
२. किती वर्ष  करायची?
३. तांदूळ-मुगाची डाळ का वाहतात?
४. मुक्याने का जेवतात?
५. मंगळागौर जागवणं म्हणजे काय?का जागवतात?
यापुढची पुजा करताना यापैकी एकही प्रश्न मनात नसेल याची खात्री आहे, कारण ती उत्तरं मला मिळतील...तीपण तुमच्या कडून.....

Friday, August 13, 2010

श्रावण - शिळासप्तमी / सीतला सप्तमी

या दिवशी जलदेवतांची प्रार्थना केली जाते. वंशामधील जे कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते परत मिळावेत म्हणून प्रार्थना केली जाते.
याबद्दल अधिक माहिती असल्यास कृपया ती पाठवावी.

श्रावण - नागपंचमी

लहान-मोठ्या मुली व स्त्रिया यांच्यामधे हा सण उत्साहात साजरा करतात. हातावर मेंदी काढतात, बांगड्या भरतात, नविन वस्त्रे घालतात, सुना आपआपल्या माहेरी जातात. माझ्या लहानपणी गारुडी "नागोबाला दूध" अशी आरोळी देत यायचे, पण आता सरकारी बंदीमूळे सर्वजण घरीच पूजा करतात.
नागचित्राची किंवा पाटावर चंदनाचे नाग काढून त्याला दूध, साखर, ज्वारीच्या लाह्या, दुर्वा वाहतात. उकडीची पुरणाची दिंड करुन नैवेद्य दाखवतात व नमस्कार करुन म्हणतात ...
" जिथे माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत."
या दिवशी काही कापू नये, भाज्या चिरु नये, तव्यावर भाजू नये, तळलेले खाऊ नये, जमीन खणू नये ( नागाला इजा होइल असे काही करु नये.) या चाली आजही पाळल्या जातात.

श्रावण - दिप पूजन / दिव्याची आवस

प्रश्नांना सुरवात झाली ती श्रावण महिन्यापासून.....

ही अमावस्या श्रावण महिन्यात येते की अमावस्या संपल्यावर श्रावण सुरु होतो? या दिवशी सर्व जुने-नवे दिवे एकत्र करुन त्यांची पूजा करतात, त्याच बरोबर कणकीचे किंवा बाजरीच्या रव्याचे गोड दिवे करतात.त्यात विशेष म्हणजे त्या दिवशी काही घरांमधे तवा ठेवला जात नाही. या मागचे कारण माहिती नाही. आणि या विषयी माहिती पण एवढीच. अता हवीयं माहिती तुमच्या कडून....