Saturday, September 11, 2010

भाद्रपद - ॠषी पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.
             कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.         
            हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे.
            आपल्या जीवनाच्या सर्वागीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी!

1 comment: