Saturday, September 11, 2010

भाद्रपद - गणेश चतुर्थी

गौरी-गणपतीच्या निमित्ताने माहेरची आठवण यायला सुरुवात झालीये. दर वर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने बसवला जाणारा गणपती कायमचा मनात घर करुन राहीलाय. माझे स्वत:चे श्रद्धास्थान म्हणजे "बाप्पा". आणि श्रद्धा अधिक वाढण्याचे विशेष कारण म्हणजे मागच्या वर्षी याच दहा दिवसात माझे लग्न ठरले आणि नविन गोड आठवणी तयार झाल्या. यावर्षी सासरी माझा पहिलाच गणेश उत्सव, आणि आठवले ते सगळे याआधीचे गणेश उत्सव..... ते असे,
आध्यात्मिक, परंपरा जपणारे आमचे बाबा यावेळी मात्र मी कसा आधुनिक विचारांचा आहे? हे दाखवुन दयायचे. तृतीयेला मूर्ति घरी आणण्यापासून ते बोटीत बसून नदीत विसर्जन करण्यापर्यंत ती मूर्ति आम्हा दोन बहिणींच्या हातात दयायचे. अभिमानाने माझी ही "दोन मुले" आहेत सांगायचे. अशा या माझ्या बाबांसाठी, त्यांनीच शिकवलेले, त्यांच्याचसाठी.... आणि तुमच्या माहितीसाठी थोडसं लिहिण्याचा प्रयत्न....
आपले आराध्य दैवत असलेल्या गणरायाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी स्थापना केली जाते. काही ठिकाणी गणपतीची शाडूची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तर अगदी चांदीची देखील मूर्ति बसवतात. ती घरी आणताना तिचा चेहरा नविन वस्त्राने झाकतात, ती आणताना चंद्राकडे पाहु नये, पाहिल्यास त्यावर्षी त्या माणसावर चोरीचा आळ येतो असं म्हणतात. यामागची पौराणिक कथा माहिती असल्यास जरुर पाठवावी. चतुर्थीला अगोदर हरतालिकेच्या पुजेचे विसर्जन करतात. नंतर गणपतीची साग्रसंगीत प्रतिष्ठापना केली जाते. त्यादिवशी गणपतीला लाल फुले ( गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते, मनुष्याला जे तेज प्राप्त होते ते त्याच्या ज्ञानामुळे. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांची झळाळी प्रखर लाल असते त्याप्रमाणेच तेजाचा रंग देखील लाल मानला जातो. अशा या तेजस्वी देवाला लाल फुले वाहतात) कमळ, दुर्वा (इतरवेळी पायी तुडवले जाणारे गवत. दुर्वांना ३ दले असतात. ती दले बालपण, तारुण्य, वृद्धत्व यांचे प्रतिक मानली जातात.या तिनही अवस्थांमधे त्या जिवनदात्याला शरण जावे, म्हणून दुर्वा वाहिल्या जातात) केवडा, तुळस, बेल अशी विविध २१ प्रकारची पत्री वाहतात. प्रसादाला पंचामृत ( दूध, दही, साखर, मध, तूप), पंचखाद्य (खारीक, खसखस, खडीसाखर, खवा, खोबरे) व उकडीचे मोदक करतात. सकाळ, संध्यकाळी आरती, अथर्वशीर्ष याचे पठण केले जाते. खिरापतीला विविध गोड पदार्थ केले जातात. दिड, दोन, पाच, सात आणि दहा दिवसांचा गणपती प्रत्येक घराच्या प्रथे प्रमाणे बसवला जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. याकारणाने लोक एकत्र जमतात, विचारांची देवाणघेवाण देखील केली जाते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण होताना दिसते.
परंतु याचे बदलेले व्यापारीक स्वरुप मात्र मुख्य उद्दिष्टापासून विचलीत करणारे आहे, नाही का?
आपले विचार, गणेशपूजे बद्दल अधिक माहिती, त्यामागच्या पौराणिक कथा, जरुर कळवा. जेणेकरुन ती सर्व माहिती आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी वाचता येईल.
तर मग परत भेटूयात... तुमच्या-माझ्या नविन माहिती सोबत....

1 comment:

  1. आपल्या पोस्ट सोबत जो बाप्पाचे जे चित्र आहे ते मला आवडले,.

    माहीती पण आवडली.

    ReplyDelete